कार्पोरेट जगतातून थेट अमराईत : फ्लोरिडामध्ये आंब्यांच्या माध्यमातून दुसरी इनिंग खेळणारे,अनिरुद्ध जोशी.
ही मुलाखत Spotify किंवा Apple Podcast वर ऐका.
बहुतेक लोक निवृत्ती नंतर शांत आयुष्याची कल्पना करतात – प्रवास करणे, गोल्फ खेळणे अथवा कुटुंबासमवेत वेळ घालवणे. परन्तु अनिरुद्ध जोशी यांनी मात्र वेगळाच मार्ग निवडला.
अनिरुद्ध यांनी टेलिकॉम क्षेत्रात जवळपास तीन दशकांची यशस्वी कारकीर्द घडवल्या नंतर त्यांनी कार्पोरेट जगाला रामराम केला आणि फ्लोरिडामध्ये आंब्याची लागवड सुरु केली, आज ते फ्लॉरिडामधील एका यशस्वी आंबा फॉर्मचे भागीदार आहेत. येथे हापूस, केशर, मल्लिका अशा भारतातील अनेक प्रसिद्ध जातींचे आंबे पिकवले जातात आणि अमेरिकेतील हजारो कुटुंबांपर्यंत पोचवले देखिल जातात.
खरतर जोशी यांना लहानपणी आंब्याचे काही खास आकर्षण नव्हते.
औरंगाबाद म्हणजेच ( आताचे संभाजीनगर) येथे त्यांचे बालपण गेले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर असलेल्या त्यांच्या गावात बांगनपल्ली सारख्या जाती अधिक प्रसिद्ध होत्या, आणि म्हणूनच, हापूस किंवा केशर सारख्या आंब्यांची चव त्यांना फारशी अनुभवायला मिळाली नव्हती.
अनिरुद्ध जोशी यांच्या आयुष्यात खरा बदल हा त्यांचा लग्नानंतर झाला. त्यांची पत्नी दापोलीची, तिचे वडील हे कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे जवळपास तीस वर्ष आंबा संशोधनाशी संबंधित होते, आणि त्यामुळेच लहानपणापासूनच तिने हापूससह अनेक उत्कृष्ट जातींचे आंबे चाखले होते .
1990 च्या दशका अखेरीस हे दांपत्य अमेरिकेत आले.
त्या काळात अमेरिकेत प्रामुख्याने मेक्सिको आणि दक्षिण अमेरीकतून येणारेच आंबे मिळत असत. ते जरी “गोड” असायचे तरी भारतीय आंब्याचा जो खास सुगंध आणि चव असते ती त्यात नसायची. अनिरुद्ध सांगतात, “माझ्या पत्नीला भारतातील आंब्यांची खुप आठवण यायची ” आणि याच आठवणीतून एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली.

अनिरुद्ध यांनी (BITS) पिलानी येथून इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले व त्यानंतर (IIT) मुंबई मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले . काही काळ पुण्यात नोकरी केल्यानंतर त्यांना अमेरिकेत कामाची संधी मिळाली. सुरवातीला कोलंबस, ओहायो येथे आणि नंतर टेलिकॉम क्षेत्रातील नोकरीसाठी ते फ्लॉरिडातील टॅपा येथे स्थायिक झाले व पुढील पंचवीस वर्ष याच क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली.
नवा विचार :
फ्लॉरिडाचे हवामान पाहुन त्यांच्या मनात एक विचार आला – जर अमेरिकेत कुठे भारतीय आंबे पिकु शकतात तर ते इथेच.
2014 , मध्ये त्यांनी आणखी दोन कुटुंबासमवेत मिळून वेस्ट पाम बीच जवळ सुमारे 20 एकर जमीन खरेदी केली,ती पुर्णपणे ओसाड होती झाडे, झुडपे, पाणी अशी कोणतीच व्यवस्था तीथे नव्हती. जमीन साफ करणे, विहीर खोदणे, माती तयार करणे आणि या बरोबरच सिंचन व्यवस्था उभारणे ही सर्व कामे सुरवातीपासूनच करावी लागली. फ्लोरिडातील USDA मान्यताप्राप्त रोपवाटिके मधून भारतीय जातीची कलमं आणण्यात आली व योग्य अंतर ठेवून झाडे लावण्यात आली. ती झाडे नुसतीच लावली नाहीत तर वाऱ्यापासून संरक्षणासाठी इतरही झाडे लावली आणि हळुहळू ओसाड जमीन एका सुंदर आमराईत बदलली. आज या फार्म वर जवळ जवळ दोन हजार आंब्याची झाडे आहेत. त्यांच्या फार्म वरील अनेक आंब्यांचे वजन तब्बल एक पौंड भरते . चांगल्या हंगामात त्यांनी सुमारे 50 हजार पौंड आंब्याचे उत्पादन घेतले आहे, मात्र फ्लॉरिडामधे आंब्याची लागवड करणे सोपे नाही. तेथील दमट हवामानामुळे झाडांवर बुरशीजन्य रोगांचा मोठा धोका असतो.
“आम्ही आमचे आंबे सेंद्रिय आहेत ” असा दावा अजिबात करत नाही, असे अनिरुद्ध स्पष्टपणे सांगतात कारण फ्लॉरिडामधे पुर्णपणे
सेंद्रिय पद्धतीने आंबे पिकवणे जवळपास अशक्य आहे. आम्ही USDA आणि FDA मान्यताप्राप्त औषधे आणि खतेच वापरतो आणि तीही परवानाधारक तज्ज्ञांकडूनच वापरली जातात. यंदाचा हंगाम तर आणखी कठीण ठरला. फेब्रुवारी , मार्चमध्ये सलग तीन वेळा पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे जवळपास सर्व मोहोर गळून पडला आणि त्यामुळे दहा वर्षांत त्यांच्या फार्म वर आंब्याचे उत्पादनच झाले नाही. तरीही ते निराश झाले नाहीत, त्यांच्यासाठी झाडे वाचली आहेत, हेच जास्त महत्वाचे आहे . पुढच्या वर्षी पुन्हा चांगले उत्पादन मिळेल अशी त्यांना आशा आहे .
नव कल्पना .
फक्त आंबे विकण्या ऐवजी त्यांनी एक नवीन कल्पना राबवली — मँगो फेस्टिवल .
टॅपा, ऑरलॅडो, जॅक्सनवहील,शार्लट, आणि इतर शहरांमधे हे उत्सव आयोजित केले जातात, येथे लोकांना 12 ते 15 जातींचे आंबे चाखायला मिळतात. शिवाय येथे भारतीय आंब्यांची माहीती देखील मिळते आणि एक आनंददायक कौटुंबिक वातावरण सुद्धा अनुभवायला मिळते. सर्वात विषेश म्हणजे , या उत्सवांना केवळ भारतीयच नाही तर अमेरिकन आणि इतर देशांतील लोकही मोठ्या संख्येने येतात.
‘अनेकांनी’ आयुष्यात हापूस किंवा केशर कधीतरी खाल्लेले असतात ते खास त्या चवीसाठी आमच्या फेस्टिव्हलला ‘आवर्जून येतात’, अनिरुद्ध सांगतात त्यांच्या फार्मवरुन अमेरिकेतील बहुतेक राज्यांमधे वेबसाइटद्वारे आंबे पाठवले जातात.
कार्पोरेट क्षेत्रातून आंब्याच्या लागवडीकडे वळण्याचा निर्णय कठीण नव्हता का ? असे विचारल्यावर अनिरुद्ध यांचे उत्तर अगदी साधे आहे ते म्हणतात ‘पैसा’ हे आमचे कधीच उद्दिष्ट नव्हते ही आमची आवड आहे. कार्पोरेट नौकरीने घर चालवले पण यातून आम्हाला खुप आनंद मिळतो, यात त्यांच्या पत्नीची भूमिकाही फार महत्त्वाची आहे कोणता आंबा नेमका कधी उतरवायचा, कोणत्या झाडाची फळे कधी काढायची याचे मार्गदर्शन त्या स्वतः कामगारांना करतात.
आता अनिरुद्ध यांचे स्वप्न आणखी मोठे आहे, ते म्हणजे त्यांना ही बाग पर्यटकांसाठी खुली करायची आहे, लोकांनी फार्मवर यावे, झाडांमध्ये फिरावे, आंब्याचा हंगाम अनुभवावा, छोट्या काॅटेज मध्ये मुक्काम करावा आणि आनंद घ्यावा अशी त्यांची “इच्छा” आहे .
अनिरुद्ध जोशी यांची कथा ही फक्त आंब्याच्या लागवडीचीच नाही तर ती आहे आपल्या मुळांशी पुन्हा जोडले जाण्याची, छंदाला व्यवसायात रुपांतरीत करण्याची आणि आयुष्याच्या दुसर्या टप्प्यातही नवी स्वप्नं पाहण्याची कथा आहे . त्यांच्यासाठी यशाची व्याख्याच बदलली आहे.
आज त्यांना सर्वांत मोठा आनंद तेव्हा होतो , जेव्हा एखादा ग्राहक फ्लोरिडामध्ये उगवलेला हापूस किंवा केशर आंबा खातो आणि हसत म्हणतो ” अगदी भारतात खाल्ल्यासारखी चव आहे.”



