Listen to the audio of the story:
१९३० साली मध्य प्रदेशातील उज्जैन येथे जन्मलेल्या अभ्यंकर यांचे लहानपण अत्यंत साध्या वातावरणात गेले. परंतु लहानपणापासूनच गणिताविषयीची त्यांची ओढ आणि जिज्ञासा विलक्षण होती. भारतात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी प्रयाण केले. त्या काळात परदेशात शिक्षण घेणे हे फार मोठे आव्हान होते. आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात गणितातील संशोधन सुरू केले.
भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जागतिक पातळीवर वर्षनुवर्ष आपली छाप पाडली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन, उद्योग आणि अशा इतर अनेक क्षेत्रांत भारतीयांनी बजावलेल्या कामगिरीला आज जगभरात मान्यता आहे.या प्रेरणादायी यशकथांमधली काही नावं प्रकाशझोतात तुलनेने कमी राहिली असली तरी या व्यक्तींचं योगदान दूरगामी स्वरुपाचं राहिलं आहे. प्रा. श्रीराम शंकर अभ्यंकर हे त्यापैकीच एक.
हार्वर्डमध्ये त्यांना प्रख्यात गणितज्ञ ऑस्कर झारिस्की यांचे मार्गदर्शन लाभले. याच काळात त्यांनी अल्जेब्रिक जिओमेट्री या अत्यंत गुंतागुंतीच्या शाखेत आपले संशोधन सुरू केले. ही शाखा गणितातील आकृती, संरचना आणि त्यामागचं तर्कशास्त्र यांचा सखोल अभ्यास करते. अभ्यंकरांनी या क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे या शाखेतले नवे आयाम खुले झाले.
हार्वर्ड विद्यापीठात डिग्री मिळवल्यावर त्यांनी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केले. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच संशोधनाला चालना दिली आणि गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय समुदायात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांची शिकवण्याची शैली कठोर पण प्रेरणादायी होती.
विद्यार्थ्यांना ते नेहमी सांगत, “गणित म्हणजे फक्त सूत्रे नाहीत, तर ती विचार करण्याची एक पद्धत आहे.” परदेशात राहूनही अभ्यंकरांचा भारताशी संबंध कधी तुटला नाही. त्यांनी भारतीय तरुणांना गणितात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. याच भावनेतून त्यांनी पुण्यात भास्कराचार्य प्रतिष्ठान या गणित संशोधन संस्थेची स्थापना केली. ही संस्था पुढे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली. ग्रामीण आणि शहरी भागातील गणितप्रेमी विद्यार्थ्यांना संधी देणे, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे आणि संशोधनाचा पाया मजबूत करणे अशा अनेक बाबतीत या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली.
अभ्यंकरांचे संशोधन केवळ गणितापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी रोबोटिक्स, संगणक सहाय्यित रचना (Computer-aided design) आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांशी गणिताचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला.
गणित हा फक्त पुस्तकांमध्ये बंदिस्त करण्याचा विषय नसून त्यात जगाच्या प्रगतीची बीजं आहेत, हे त्यांच्या कामातून सतत दिसून येत राहिलं.
अभ्यंकरांनी त्यांच्या कामातून भारतीय आणि पाश्चिमात्य जगाला एकत्र आणले. एकीकडे त्यांनी अमेरिकन संशोधनविश्वात भारतीय बुद्धिमत्तेची ताकद दाखवून दिली, तर दुसरीकडे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर विचार करण्याची प्रेरणा दिली.
आयुष्याच्या शेवटपर्यंत ते संशोधनात गुंतून राहिले. गणित ही त्यांच्यासाठी एक पैसे कमवायचं साधन नव्हतं, तर एक साधना होती. त्यांची ही आजन्म साधना २०१२ साली पूर्णत्वाला गेली. त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी त्यांना गणिताची तपस्वी म्हणायचे.
आज भारतीय डायस्पोराच्या कथा सांगताना आपण उद्योजक, तंत्रज्ञ किंवा डॉक्टरांचा उल्लेख करतो. परंतु प्रा. श्रीराम अभ्यंकरांसारख्या संशोधकांची कहाणीही तितकीच महत्त्वाची आहे.
त्यांचं जीवन तरुणांना एक साधा पण महत्त्वाचा संदेश देते: स्वप्न मोठे असले पाहिजेच!
MAIN IMAGE COURTSEY: Mathematisches Forschungsinstitut Oberwolfach



